logo

शाहू महाराजांचे विचार, नव्या पिढीसाठी दीपस्तंभ- मौर्य क्रांती संघ महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत यांचे प्रतिपादन शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव, शिरूडमध्ये समतेचा संदेश

शाहू महाराजांचे विचार, नव्या पिढीसाठी दीपस्तंभ- मौर्य क्रांती संघ महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत यांचे प्रतिपादन

शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव, शिरूडमध्ये समतेचा संदेश

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) - दादासाहेब व्ही झेड पाटील माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त आज एक सविस्तर व्याख्यानमाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य उपाध्यक्ष आण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांच्या संयुक्त विद्यमाने मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र आणि विद्यालय व्यवस्थापनाने केले होते.
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात जातीअंतासाठी अनेक साहस केले. त्यांनी कोल्हापूर संस्थानात ५०% आरक्षण लागू केले, जस्मध्ये समाजातील मागास वर्गांना शिक्षण आणि रोजगाराचे संधी मिळाले. अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी त्यांनी स्वतःहून कार्य केले. उदाहरणार्थ, गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून दिले आणि स्वतः त्या हॉटेलमध्ये सरदार व्यापाऱ्यांसह चहा आणि नाश्ता करत समानतेचा संदेश दिला.
कार्यक्रमात वर्णन करण्यात आले की, लठ्ठे अधिक्षकांनी वस्तीगृहात कर्मवीर भाऊराव पाटील यांना मज्जाव केला होता, तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या घरी त्यांना आदरपूर्वक जेवण देऊन समाजातील विषमतांविरोधात धाडस दाखवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या काळात, शाहू महाराजांनी रमाईंबाईंना बहीण समजून त्यांच्या राजवाड्यात सन्मानाने वागविले. त्यांनी विमुक्त जातींना घरे बांधून दिली आणि उद्योगांचे प्रोत्साहन केले.
शिवाय, शेतकऱ्यांसाठी स्वखर्चाने राधानगरी धरण बांधले, बहुजन समाजासाठी शाळा वस्तीगृह उभारले आणि पैलवानांसाठीचाही पुरेशा प्रमाणात खुराकाचा बंदोबस्त केला. यामुळे सामाजिक न्याय सुधारणा आणि बहुजन समाजाच्या उन्नतीत मोठा वाटा शाहू महाराजांनी उचलला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी मुख्याध्यापक यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनचरित्राचा सखोल आढावा घेऊन उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गुलाब बोरसे यांनी केले तर आभार योगिता देशमुख यांनी मानले. यावेळी व्ही डी सूर्यवंशी, पी जे निकम, मंगलसिंग जाधव, सविता बोरसे, राधिका पाटील, वैशाली भोई, धीरज पाटील, अरुण पाटील, भास्कर गायकवाड आणि राहुल लांडगे यांनी परीश्रम घेतले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सामाजिक न्याय, समानता आणि समृद्धीचा संदेश देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित हा कार्यक्रम यशस्वी ठरला.
शाहू महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, सामाजिक एकतेसाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्नरत राहण्याचा संदेश या व्याख्यानातून देण्यात आला.

1
234 views