*"हिंदू राष्ट्रात हिंदूंचेच संमेलन घेण्याची वेळ येणे हे मोठे दुर्दैव" – शरद पोंक्षे यांचे इंद्रायणी नगर भोसरीत प्रतिपादन; संदीप जाधव यांनी मांडला 'पंच परिवर्तनाचा' विचार*
इंद्रायणी नगर, भोसरी : "आज जगात चिनी लोकांचा चीन आहे, ख्रिश्चन राष्ट्रांचे स्वतंत्र देश आहेत, ५५ मुस्लिम देश आहेत; मात्र दुर्दैवाने हिंदू राष्ट्रातच हिंदूंना संघटित करण्यासाठी संमेलने घ्यावी लागत आहेत, ही परिस्थिती अत्यंत क्लेशदायक आहे," असे प्रखर प्रतिपादन प्रसिद्ध हिंदुत्ववादी वक्ते मा. श्री. शरद पोंक्षे यांनी केले.
सकल हिंदू समाज, इंद्रायणी नगर भोसरी यांच्या वतीने इंद्रायणीनगर येथे आयोजित 'विराट हिंदू संमेलनात' ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य मा. श्री. संदीप जाधव यांनी पंच परिवर्तन या विषयावर मार्गदर्शन केले.
‘संघाने १०० वर्षांत व्यक्ती निर्मानाचे काम केले ’ - संदीप जाधव
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली प्रवासाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, "संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत आणि या शतकोत्तर प्रवासात संघाने व्यक्ती निर्माण करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले आहे." यावेळी त्यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
१. पर्यावरण रक्षण: निसर्गाचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे.
२. कुटुंब प्रबोधन: संस्कारक्षम कुटुंबातूनच बलशाली समाज घडतो.
३. स्वबोध जागरण: आपल्या संस्कृतीचा, देशाचा आणि धर्माचा सार्थ अभिमान बाळगा.
४. नागरिक शिष्टाचार: शिस्तबद्ध नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडा.
५. सामाजिक समरसता: जातीभेद विसरून सर्व हिंदू एक आहेत हा भाव जोपासा.
"सेक्युलर" नावाखाली हिंदूंचे खच्चीकरण - शरद पोंक्षे
शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, "आज बहुसंख्य असूनही हिंदूंना स्वतःची ओळख सांगायला भीती वाटू लागली आहे. 'गर्व से कहो हम हिंदू है' म्हणायला, कपाळावर टिळा लावायला किंवा हातात भगवा घ्यायला हिंदू घाबरत आहे. जगात इतर धर्माचे लोक आपल्या धर्माप्रती कट्टर आहेत, मात्र हिंदुस्थानात हिंदूंना 'निधर्मी' (Secular) बनवून ठेवले जात आहे. हिंदूंचे हे संमेलन म्हणजे कोण्या धर्माचा द्वेष करण्यासाठी नसून, स्वधर्माचा विसर पडलेल्या हिंदूंना संघटित करण्यासाठी आहे."
कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक हनुमान चालीसा पठणाने झाली. यावेळी संपूर्ण परिसर 'जय श्रीराम' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. या विराट संमेलनाला इंद्रायणी नगर भोसरी आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हजारो हिंदुत्वप्रेमी नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याचा समारोप वंदे मातरम ने करण्यात आला.