अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने लाॅक; जिल्हाधिका-यांचा नवा आदेश
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात येत्या १३ ऑगस्टपासून पुढील आदेश येइपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने पुर्णत: बंद ठेवावीत अशी सूचना करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील माढा माळशिरस करमाळा सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांतील गावांत कडक निर्बंध राहणार आहेत.साेलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या तालुक्यांत काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी प्रशासनाने लाॅकडाउन अंतर्गत कडक निर्बंध लावण्याचे आदेश जारी केले आहेत.त्यानूसार पंढरपूरसह पाच तालुक्यांमध्ये येत्या १३ ऑगस्ट पासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवावीत, अत्यावश्यक सेवांची दुकाने दुपारी चार पर्यंत सुरू ठेवावीत, मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना पूर्णत: बंदी, विवाह सोहळ्यास ५० ऐवजी २५ लोकांची उपस्थिती हवी, खासगी आणि सार्वजनिक प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरू राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या देखील कमी झाली आहे. त्यातच आता संचार बंदीचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.